Monday, 15 February 2016

मुंबई ते रोहतांग- भाग दुसरा - दिवस पहिला - ९/०८/२०१३

मी झोपेत अजून रायीडला जाऊ कि नको हाच  विचार करत होतो, इतक्यात मला हळुवार हाक ऐकू येते. "ओंकार, साडे तीन वाजले",  १० वीच्या परीक्षेच्या वेळी आई रोज उठवायची आठवण मला झाली.एरव्ही सकाळी  ८ वाजे पर्यंत मी कुंभकर्णाची भूमिका सहज पार पाडली, पण मनावर असलेल्या दडपणामुळे माझ्या पापण्या अलगद उघडले, हॉलं मधील अंधुक लाईट मध्ये मला वर्षा किचनच्या दिशेने जाताना दिसत आहे.  मी जागेवर उठून स्वस्थ बसून नित्य जप म्हणतो आणि बापू, नंदाआई व दादा यांच्या फोटोकढे बघत बसलो. आत्तापासून पुढील ९ दिवस, वर्षा, आंजनेय (६ वर्ष) आणि  अर्जुन (२ महिने) घरी एकटेच राहणार या भीतीने मन कातरल होत.शिवाय मी एकटा रायीड करणार, यापूर्वी  मी जास्तीत जास्त ३ दिवस रायीड केली होती. ती देखील मुंबई ते रत्नागिरी, माझ्या गावी, म्हणजे ओळखीचा रस्ता, ओळखीची लोकं, सारे काही आपले. पण आता मी पहिल्यांदाच बाइक वरून महाराष्ट्राबाहेर जाणार ते देखील ९ दिवस. नको नको ते विचार अगदी चित्रांसहित डोळ्या समोरून स्टेशन वरून निघून जाणाऱ्या लोकल ट्रेन प्रमाणे भरभर जात होते. इतक्यात  बापूंचा, नंदाआईचा आणि दादांचा हसरा चेहरा मला पुन्हा वर्तमानात घेऊन येतो, त्यांच्या छत्र छायेत, क्षणभर मीही हसलो आणि लगेचच निश्चिंत झालो. 

वर्षाची किचन मधली धावपळ चालूच होती. ती प्रचंड तणावात असलेली मला जाणवले पण तिच्या हालचालीतून ती तितकीच खंबीरही जाणवत होती, "ओंकार, साडे तीन वाजले" यावाक्यानंतर तिने एकही शब्द माझ्याशी बोलली नव्हती. मला तिची घालमेल माहित असूनही मीही तिच्याशी न बोलण्याचा विचार केला व आपले प्रात: विधी उरकून तयार झालो. कारण जर तीचा बांध फुटला तर माझी रायीड रद्द.

मी घरातून निघताना तिला माझा एक फोटो काढण्यास सांगितला तोही तिच्या मोबाईल मध्ये, आणि बाईसाहेबांचे डोळे पाणावले. झाला बट्ट्याबोळ, पण आता मन उंबरठ्याबाहेर होते, मी तिला प्रेमाने आलिंगन दिले आणि माझ्या बाइकच्या (वॉरहॉर्स) दिशेने कूच केली. 

                                               
रात्रभर पडलेल्या पावसाने रस्ता पार धुवून निघाला होता, व वातावरणात हवाहवासा वाटणारा गारवा मनाला आणि शरीराला सुखावत होता.  वॉरहोर्स अगदी आतुरतेने माझी वाट बघत होता, पहिल्यांदाच तो महाराष्ट्राबाहेर फिरायला जात होता. माझ्याप्रमाणे त्यालाही नेहमीच्या ट्रफिक जॅम, खड्डे या रुटीन मधून ब्रेंक मिळणार होता. किंबहुना आज त्याच्या मालकावर तो बेहद खुश असावा कारण अगदी एका किक सरशी तो माझ्याशी बोलू लागला " धक धक धक धक धक धक धक धक……….”.  नेहमी प्रमाणे मी त्याच्या पुर्णांगला उदी लावली.

                        
मुंबई बाहेर जाताना नेहमीप्रमाणे मी खार  येथील गुरुक्षेत्रम (आम्हा श्रद्धावानांचे शक्तीस्त्रोत) येउन पोहचलो. रात्रभर पठण  करणार्‍या श्रद्धावानांच्या पठणात व्यतय येणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी प्रयाण केले. एव्हाना मी मिलन सबवे येथील नुकत्याच तयार झालेल्या उड्डाणपुलावरून NH8 च्या दिशेने म्हणजे मुंबई अहमेदाबाद महामार्गाच्या दिशेने. उड्डाणपुलावरून एअरपोर्टवरून आपल्या गन्तव्यदिशेकडे झेपावणारी विमाने मी क्षणभर पाहत होतो. त्यांच्या उड्डाणामध्ये आणि माझ्या मध्ये फरक इतकाच कि त्यांनी त्यांचा जमिनीशी संबध सोडला होता आणि मी जमिनीशी रस्त्याशी नाळ जोडून होतो. पण तरिही मी अजून घरातच होतो.  वॉरहॉर्स ६० किमी च्यावर नेण्यास मला कधी जमतच नाही, नेमकं काहीतरी मागे राहिल्यची जाणीव मला होते, हो मन अजून घरीच वर्षा आणि मुलांमध्ये अडकून बसले आहे. मला ते तिघही दिसत आहेत, इतक्यात बाजूने जाणारा भरधाव ट्रक मला पुन्हा वर्तमानात घेऊन येतो. मी लागलीच आपली बैठक स्थिर करून रस्त्यावर नजर टाकली. तर लक्षात आलं कि दहिसर टोल नाका मी केव्हाच क्रॉस करून फौंटन हॉटेल जवळून जात आहे. अजून पाचच वाजले असल्याने उजाडले नव्हते, पार्ले ते इथवर मी कसा आलो ते मला कळलच नाही खरतर मन अजूनसुद्धा द्विधा मनस्थितीतच आहे कारण मी मनाने अजूनही घरातून निघालोच नव्हतो.  
             

 २ किमी पुढे जातो न जातो पावसाने देखील माझ्या रडवेल्या मनाला सोबत देण्याचे ठरविले आणि तो देखील चांगलाच मागील १५ मिनिटे माझी समजूत काढत आहे. माझ्या बायकोचे नाव वर्षा असल्यामुळे मी पावसाला कधीच दोष देत नाही, विनोद वगळता मला पाउस खूप आवडतो. पण मी ही इरेला पेटलो आणि बॅगेतुन रेन कोट काढून पुढील प्रवासाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे सिमेंट आणि वाळू मध्ये पाणी मिसळल्यावर कोन्क्रीट तयार होते त्याप्रमाणे मी माझा निर्धार पक्का केला आणि त्यासाठी त्या पावसाची फार मोठी मदत झाली.
आणि पाउसही आल्या पावली निघून गेला आहे. विरारनंतर महाराष्ट्र किती सुंदर आहे याची मला पावलोपावली प्रचीती आली. त्यात परतीचा पावसाळा यामुळे वातावरण अगदी हिरवेगार. महाराष्ट्र बोर्डरपाशी मी आलो. एकापाठोपाठ एक लागलेल्या ट्रक्सची रांग जणू मंदिरातल्या रांगेप्रमाणे भासत होते. दोन्ही राज्याचे टोल नाके अगदी सक्रिय. सुदैवाने बाइकला भारतात फार कमी ठिकाणी टोल भरावा लागतो. आतापर्यंत तीन तास झाले आहेत म्हणून मी तेथे नैसर्गिक विधीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत माझ्या नवीन अंक्लेट बुटामध्ये पावसचे चांगलेच पाणी साचले होते. बुटामधूनच  "पचाक पचाक " असा पाण्याचा आवाज मला त्रासदायक वाटत होता. मला बग उघडून दुसरे सॉक्स घालण्याचा प्रचंड कंटाळा आलेला म्हणून मी थोडावेळ बूट आणि सॉक्स वाऱ्यावर सुकविण्याचा प्रयास करतो परंतु तो फोल ठरला.

पाउस आता थांबला आहे व उन्हाचा सहवास लाभल्याने मी आता मोबाइल  मधील गाणी ऐकण्यास सुरवात करतो तेच पहिले गाणे " आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पिछे…….. एकदम परफेक्ट गाणे. हेल्मेट मध्ये गाणे ऐकताना व सोबत गाताना स्वत:चाच आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. ती मजा काही औरच. 
वापी, सुरत, बडोदा मागे टाकत मी दुपारी दोनच्या सुमारास अहमदाबादला पोहचलो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला थकवा बिलकुल जाणवला नाही. म्हणून मी पुढे हिम्मतनगर पर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. हिम्मतनगर क्रॉस करून मी रस्त्यालगत असलेल्या एका साध्या धाब्यापाशी थबकतो.

हा धाबा म्हणजे तिथे मोल मजुरी करणाऱ्या कामगारांसाठी विसावा घेण्यासाठी बांधलेली एक शेड आहे. माझे डोळे मेनू शोधत असताना तेथे काम करणारा एक विशीतील तरुण मला जेवणात "सिर्फ दाल बाटी मिलेगा" असे बजावून सांगितले. एकदम कोड उलघडल्यागत मी ही लगेच त्याला "एक प्लेट देना " म्हणून सांगितले.  बाटी काय हे मला तो पर्यंत एकूनच माहिती होते. लगेच तो एका प्लेट मध्ये ५ बाटी घेऊन आला व एक मोठे ताट स्वच्छ करून माझ्या समोर मांडले. सर्व मांडणी करून आता पाच मिनिटे झालीत पण या बाटीचे पुढे काय करायचे मला समजत नव्हते. कदाचित डाळ आपण आपल्या घरातून आणायची असते किंवा त्याने कुठेतरी लपवून ठेवली असावी व त्याचा शोध घेण्याचा हा खेळ तर नसावा असे फालतू विचार मी करू लागलो. बर त्याला विचारायचे तर आपल्याला या जगात काहीच माहित नाही असे गृहीत धरून आत्तापर्यंतचे माझे  सर्व शिक्षण व्यर्थ असा त्याचा गैरसमज झाला तर माझा फार मोठा अपमान. कारण गुजरातच्या  राजस्थाननजीकच्या   सीमा भागात दाल बाटी हा आपल्या येथील वरण भाता सारखा प्रकार (हे सर्व  ऐकीव ज्ञान). भूक तर पुष्कळ लागली आहे पण अहंकार आडवा येतोय. तितक्यात बाजूच्या टेबलवर काही लोकल मंडळी आली आणि दाल बाटी खायला सुरवात केली. तेव्हा कळले की जो पर्यंत बाटी कुस्करत नाही तो पर्यंत डाळ वाढत नाही. 
जीवनातील एक मोठा धडा त्यादिवशी मी शिकलो की रायीड करताना नविन ठिकाणी असाल तर कोणताही अहंकार उराशी न बाळगता तेथील लोकांशी मुक्त सवांद साधावा जेणेकरून तेथील संस्कृतीचा, राहणीमानाचा योग्य अंदाज घेता येईल. व आजवर तो मी पाळत आहे. 
दाल बाटीचा यथेच्छ समारोप घेत, दोन ग्लास ताक पिऊन मी एकदम ताजा तवाना झालो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिल फक्त ५४ रुपये, म्हणूनच का महाराष्ट्रातील बरेचसे व्यवसाय इतर राज्यात स्थलांतरित  होत असावेत, जाऊ दे सध्या तो आपला विषय नाही असे म्हणून मी पुढे निघालो. ४ वाजले होते, आणि अजून पुरेसा प्रकाश आहे समोरील हिरवा बोर्ड इतर ठिकाणासोबत उदयपुर १२९ किमी दाखवतो. बेरीज-वजाबाकी करून मी उदयपुर गाठायचे ठरविले. आणि मग काय पुन्हा गाणे, निसर्ग, हो आता निसर्ग पूर्ण बदलेला होता अगदी वेगळा, गुजरातच्या इंडस्ट्रीयल पट्ट्यातून तो पुरता नाहीसा झाला होता. 

मी राजस्थान ओलांडताना एक पेट्रोल पंप वरील" "गुजरात से भी सस्ता पेट्रोल" ही पाटी वाचली. अशी पाटी मी गुजरात मध्येहि वाचलेली होती ती अशी "महाराष्ट्र से सस्ता पेट्रोल " फरक एवढाच राजस्थान ला "भी" वापरून आम्ही गुजरातपेक्षाही पुढे आहोत असे सिद्ध करायचे होत बहुतेक. असो

पावसाळी वातावरण असल्याने संध्याकाळी ७च्या सुमारास काळोख झाला व मला हेल्मेटचे विंडशिल्ड उघडणे भाग पडले. नाईट विजन गॉगल नसल्याने मला फारच त्रास झाला. उदयपुर ८ किमी दाखवणारा बोर्ड पाहून मी सुखावलो.
दोन-चार ठिकाणी चौकशी केल्यानंतर, नेहमीप्रमाणे घासाघीस करून ५०० रुपयात उदयपुर रेल्वेस्थानकासमोरील शिवाजीनगर येथे मी एक रूम मिळवली. शरीराचे जास्त चोचले पुरवायचे नाहीत या एका अटीवर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फिरू शकता. पण तब्बल १६ तासाच्या प्रवासानंतर व ८०० किमी चा पल्ला पार पाडल्यानंतर "गरम पाण्याची आंघोळ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे मीच स्वतःला पटवून दिले. शिवाय पावसामुळे महामार्गावरील धुळीचा चांगलाच राप माझ्या चेहऱ्याने कमावलेला असतो. बाथरूम मध्ये आरश्यात पाहताना "आईना मुझसे मेरी पहलीसी सुरत मांगे" हे गाणे गुणगुणत आंघोळ आटपून बाहेर पडलो. उद्याचा दिवस उदयपुर पाहू आता फक्त जेवण आणि झोप.  हो त्याआधी वर्षाबरोबर खूप गप्पा.
क्रमश:


19 comments:

  1. Eager to read more...plz post next part asap

    ReplyDelete
    Replies
    1. sure. thanks for your time to go through my blog.

      Delete
  2. Too good...very well narrated
    same here egar to read more 😊

    ReplyDelete
    Replies
    1. thank you. sure i will post next update asap

      Delete
  3. Too good...very well narrated
    same here egar to read more 😊

    ReplyDelete
  4. Eager to read more...plz post next part asap

    ReplyDelete
  5. U r always amazing and I think now I m big fan of your writing skill too... Too good keep it up... Waiting for next

    ReplyDelete
  6. U r always amazing and I think now I m big fan of your writing skill too... Too good keep it up... Waiting for next

    ReplyDelete
  7. ओंकार अप्रतिम प्रवासवर्णन, पावला पावलाला उत्कंठा वाढविणारे. दूरच्या प्रवासाला घराबाहेर निघताना साहजिकच पत्नी , मुलांच्या विरहाने मन व्याकुळ होते त्या तरल भावनांचे वास्तववादी शब्दांकन वाचताना हेलावून जाते मन. प्रवासाला निघताना आपल्या वंदनीय स्थानाचे दर्शन घेऊन निघण्याचा भाव अधिकच भावला. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत...

    ReplyDelete
  8. अप्रतिम!! तुझ्या बाईकच्या मागच्या सीटवरुन प्रवास केल्याचा भास झाला.

    ReplyDelete
  9. अप्रतिम!! तुझ्या बाईकच्या मागच्या सीटवरुन प्रवास केल्याचा भास झाला.

    ReplyDelete
  10. ओंकार मस्त प्रवास लेखन, क्षणोक्षणी उत्कण्ठा वाढवणारं! अक्षरशः प्रवास अनुभवला, पुढच्या पोस्टची वाट बघतोय मित्रा.

    ReplyDelete
  11. ओंकार मस्त प्रवास लेखन, क्षणोक्षणी उत्कण्ठा वाढवणारं! अक्षरशः प्रवास अनुभवला, पुढच्या पोस्टची वाट बघतोय मित्रा.

    ReplyDelete
  12. ओंकार, तूझ्या वॉरहोर्सप्रमाणेच् आम्ही देखील उत्सूक आहोत पुढील प्रवासासाठी! अप्रतिम वर्णन जणू आपणसुद्धा अनुभवतोय ही राईड!!!!

    ReplyDelete
  13. क्रमशः का मित्रा? U shud have gone on and on and on.....तुझ्या वाचकांवर हा असा अत्याचार? लवकर पुढचा भाग...

    ReplyDelete